नवी दिल्ली : देशात राज्यसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 27 फेब्रुवारी रोजी 15 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत यांवर मतदान होणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने परिपत्रक काढले आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार अनिल देसाई, प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, व्ही. मुरलीधरन, नारायण राणे आणि वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
56 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपणार आहे. या 56 जागांपैकी सर्वाधिक 10 जागा उत्तर प्रदेशातील आहेत. याशिवाय महाराष्ट्र आणि बिहारमध्ये प्रत्येकी 6 जागा आहेत. तर मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 5 जागा आहेत. 27 फेब्रुवारीला कर्नाटक आणि गुजरातच्या 4-4 राज्यसभेच्या जागांवरही मतदान होणार आहे. याशिवाय तेलंगणा, राजस्थान आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 3 जागांवर मतदान होणार आहे. याशिवाय छत्तीसगड, उत्तराखंड, हरियाणा आणि हिमाचलमध्ये प्रत्येकी एका जागेवर मतदान होणार आहे.
27 फेब्रुवारीला राज्यसभेच्या 56 जागांवर मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहेत. आयोग 8 फेब्रुवारी रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करेल. नामांकनाची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. उमेदवारी अर्ज छाननीची तारीख 16 फेब्रुवारी आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेता येणार आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तयारीत पक्ष व्यस्त असताना निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली. अशा परिस्थितीत राज्यसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या 56 जागांच्या निवडणुकीनंतर संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे राजकीय चित्र बदलणार आहे.