सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या वेशीपर्यंत आला आहे. अवघ्या काही तासांत ते मुंबईत दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण देणारच. काल आणि आजही तीच भूमिका आहे. इतर समाजाला धक्का न लावता आरक्षण देणार, असेही शिंदे यांनी म्हंटले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कालही तीच भूमिका होती आणि आजही तीच आहे. तर समाजाला धक्का न लावता आरक्षण देणार आहोत. मागास आयोग काम करत आहे. 40 हजार लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. कुणबी नोंदी सापडल्यावर ते प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे.
जरांगे पाटील यांच्यासोबत सातत्याने ज्या-ज्या चर्चा होत आहेत. त्यासाठी सरकार सकारात्मक आहे. सरकार आखडता हात घेणार नाही. आरक्षण देण्यावर ठाम आहे. कुणबी नोंदीमध्ये काही सूचना येत आहेत. त्या सूचना अंमलात आणल्या जात आहेत. सरकार जर सकारात्मक नसेल तर आंदोलन ठिक आहे. सरकार सकारात्मक असेल तर त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. सर्व मराठा बांधवांनाही आवाहन आहे. सरकार तुमचेच आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, वाशीपासून मुंबईपर्यंत चालत जावून आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगेंनी सभेत जाहिर केले होते. आम्ही मुंबईला शांततेत जाणार, शांततेत बसणार आणि आरक्षण घेणार आहे. आम्ही कोणतीही गडबड करणार नाही असा शब्द मी सरकारला देतो, असेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच, रॅलीत कोण गडबड करत असेल तर लक्ष ठेवा, असे आवाहनही जरांगेंनी केले होते.