मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी आणि निर्यातदार व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे राज्यभरात शेतकरी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. तर, विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना हिवाळी अधिवेशनात चांगलंच घेरलं आहे. दरम्यान, कांदा निर्यातबंदीचा मुद्दा आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडला. या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी मोठा आघात असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांची भूमिका मांडणार का? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. याशिवाय राज्य सरकारने याबाबत सुस्पष्ट भूमिका घ्यावी आणि शेतकऱ्यांचे 2 हजार 500 रुपयांचे नुकसान सरकार सोसणार का? असा प्रश्नही दानवे यांनी यावेळी केला
देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर
देशात कांदाची उपलब्धता ही केवळ 25 ते 30 टक्के असून कांदा निर्यात केल्यास देशात कांद्याची टंचाई निर्माण होऊन अडचण होऊ शकते. त्यामुळे यातून मार्ग काढण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांना अडचण झाल्यास राज्यातील कांदा हा केंद्र सरकार खरेदी करायला तयार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या संदर्भात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचाशी चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.