२०२२ साली होणाऱ्या मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयार केल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेसचे मंत्री व वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
बृहन्मुंबई मनपा निवडणुकीसाठी रणनिती ठरवण्यासाठी मंगळवारी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी प्रभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढतील असे सांगण्यात आले होते. यासाठी विधानपरिषदेच्या जागांसाठी देखील आघाडी टिकवण्यात आली. मात्र, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यानंतर आता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली.
मतदारसंघात पुनर्रचना करताना त्यात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. अनुसूचित जाती, जमाती व महिलांना त्यात योग्य ते प्रतिनिधित्व दिसून येत नाही. त्यासंदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते जनार्दन चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल मुख्यमंत्री व निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे.