राज्यात राजकीय गदारोळादरम्यान आज महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा पार पडली. महाविकास आघाडीतील अनेक मोठ्या नेत्यांनी भाषणातून भाजप आणि शिंदे गटावर नेहमीप्रमाणे टीका केली. त्यातच यासभेत बोलताना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर निशाणा साधला. याच सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर टीका करत गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाले नाना पटोले
नागपुरमधील मविआच्या सभेत बोलत असताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडून राज्यात काॅमेडी शो सुरु असल्याचा बोचरा वार नाना पटोले यांनी केला. संभाजीनगरमधील दोन गटांच्या वादात पोलिसांकडून मुद्दाम दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, नागपुरातील सभेच्या जागेचा वाद निर्माण करण्यात आला. भाजप का घाबरतं? असा सवाल त्यांनी यावेळी केला. देशातील महागडे शहर नागपूर असल्याचे ते म्हणाले. जे काही आणलं आहे ते सगळं कर्जातून आणलं आहे. जनतेच्या खिशातून पैसे लुटले जात आहेत. नागपूरकरांना लुटलं जातं आहे. पिण्याचे पाणी दिलं जात नाही. नागपुरात भयावह परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. एक प्रकारे लुटण्याचे काम सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले की,पुलवामा हल्ल्यातील स्फोटकं नागपूरमधून गेलेत, त्याच्या सीबीआय चौकशीचं काय झालं? राज्यात अवकाळीने नुकसान झालं आहे आणि राज्यात मुख्यमंत्र्यांचा काॅमेडी शो सुरु असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. त्यांना काही देणघेणं नसल्याचे ते म्हणाले. आम्ही सत्तेत असताना भरीव मदत केली. एका पैशाची मदत नसल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जाहिरातीवर 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, एकंदरीत भयंकर परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.