संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी पंतप्रधान लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. सोबतच त्यांनी विरोधीपक्षावर जोरदार टीका केली. एक दिवस आधी आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना उद्योगपती अदानी वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आणि अनेक प्रश्न विचारले. त्यानंतर पंतप्रधान बोलले पण अदानींबद्दल उल्लेख देखील केला नाही. त्यावरच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
मी (पंतप्रधानांच्या भाषणावर) समाधानी नाही. चौकशीबाबत काहीही बोलले नाही. जर ते (गौतम अदानी) मित्र नसतील तर चौकशी व्हायला हवी असे त्यांनी (पंतप्रधान) सांगायला हवे होते. हे स्पष्ट आहे की पंतप्रधान त्यांचे (गौतम अदानी) संरक्षण करत आहेत. त्यापूर्वी, मंगळवारी त्यांनी मोदी सरकारमध्ये अदानींचा व्यवसाय प्रचंड वाढला आणि भाजपला त्याचा वैयक्तिक फायदा झाला, असा दावा केला होता.