मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील वाद समोर आला आहेत. मविआमध्ये दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गट सोडण्यास तयार नव्हता. यामुळे काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होती. यामुळे मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर आता कॉंग्रेसकडून प्रतिक्रिया तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले म्हणाले की, आजपासून सुरु होणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ईडी, सीबीआय, आयटी यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्यासोबत घेत आहेत, असा निशाणा त्यांनी भाजपवर साधला आहे.
काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायेत पण ते यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्ती सोबतच असंवैधानिक भाजप, शिंदे, अजित पवार सरकारचाही शेवटही होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनीही मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर टीका केली आहे. मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेस पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा दिल्यामुळे राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला एका प्रकारे अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. याचबरोबर काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते मुरली देवरा यांनाही हा निर्णय आवडला नसेल, अशी खंतही त्यांनी केली आहे,.