राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली असताना अशातच रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणावरून आता शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप असे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणाचा नेमका सूत्रधार कोण आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना पक्कं माहिती आहे. असे विधान केले. आता या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी कणेरी मठावर होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाची पाहणी केली. पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पत्रकार जीव धोक्यात घालून काम करत असतात. हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. त्यामुळे पत्रकार वारिसे यांच्यावर हल्ला करणाऱ्याला कोणत्याही प्रकारे पाठिशी घातले जाणार नाही. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कायद्यानुसार शिक्षा होणारच असल्याचे त्यांनी म्हटले. मला राजकीय वक्तव्याला उत्तर द्यायचे नाही, पण जे दोषी असतील त्यांना पाठीशी घालू नका अशा सूचना दिल्या आहेत. असे त्यांनी स्पष्टपणे माध्यमांशी बोलताना सांगितले.
एसआयटी गठित करण्याचे निर्देश
कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यू प्रकरणी आता वारिसे प्रकरणात SIT गठीत करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिले आहेत.