आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूनमधील खेड येथे जाहीर सभा पार पडली. केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह दिल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची सभा झाली. त्यामुळे यासभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. उद्धव ठाकरेंच्या याच टीकेवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
उद्धव ठाकरेंच्या टीकेला बावनकुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचा भाषणातील एक वाक्य घेतले. 'भाजपाच्या व्यासपीठावर आधी साधू असायचे, आता संधीसाधू - उद्धव ठाकरे' असे वाक्य घेत त्यावर बोलताना ते म्हणाले की, पालघरची घटना इतक्यात विसरलात? उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या. मारेकऱ्यांना तुम्ही पोटाशी धरले.रक्ताचे पाट तुमच्याच कारकिर्दीत वाहिले. शिमग्याच्या बोंबा पुरे आता.. असे जोरदार प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.