नागपूर : कसबा-चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात महाविकास आघाडी कसब्यात विजयी झाली आहे. या पार्श्भूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसत असल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या या विधानावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. पवार साहेबांनी कदाचित देशातील 3 राज्याचे निकाल पाहिले नसावे. त्यांनी अगोदर पाहावे, असे त्यांनी म्हंटले आहे.
कसब्याचा निकाल मान्य केला आहे. 51 टक्के लढाई होती पण 4 टक्क्यांनी लढाईत कमी पडलो. धंगेकर यापूर्वी दोन वेळा पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांच्याबाबत सहानुभूती होती. चिंचवडमध्ये आम्ही 51 टक्के लढाई जिंकलो. शरद पवार यांनी कदाचित देशातील तीन राज्यांचे निकाल पाहिले नसावे. त्यांनी अगोदर ते पाहावे. तेथे संपूर्ण काँग्रेस साफ झाली आहे. या राज्यात राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली होती. त्यानंतर हा काँग्रेसचा पराभव आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना नुकसान मदत करण्याचे फडणवीस-शिंदे यांनी जाहीर केलंय. विरोधकांना जुने दिवस आठवत नाही. त्यांनी 20 रुपये नुकसान भरपाईचे चेक शेतकऱ्यांना दिले होते, असेही त्यांनी म्हंटले आहे.
तर, संजय राऊत यांनी 2024 च्या निवडणुकीत 200 जागा जिंकण्याचा दावा केला होता. यावर बावनकुळे म्हणाले, त्यांना आपले लोक सांभाळता येत नाही. ते काय निवडणुका लढवणार. एक कार्यकर्ता तयार करायला 30 वर्ष लागतात. त्याच्यावर काय संस्कार आहे. तशा पद्धतीने जनता बिलकुल निवडून देणार नाही. निवडणूक लढायला त्यांच्याकडे लोकं उरले पाहिजे, असा निशाणा त्यांनी साधला आहे. भाजपाकडे कसबामध्ये मत कायम होते. ब्राह्मण समाजाने कधीही देश, देव, धर्म, संस्कृती सोडून विचार करत नाही. कसबामध्येही ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाला मारहाण करणे आणि दहशत निर्माण करणे योग्य नाही. जो कोणी गुन्हेगार असेल त्याबाबत गृहखाते योग्य तपास करून शिक्षा करेल, असे त्यांनी सांगितले आहे.