मुंबईत भाजप आमदार प्रसाद लाड आयोजित केलेल्या स्वयंरोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. त्यावेळी बोलत असताना राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवलेला पाहायला मिळाले. चाफा बोलेना, चाफा उगवेना. पण, असाही चाफा आहे जो उगवत नाही, फुलत नाही आणि वास येत नाही. असा चाफा फक्त मातोश्रीतच आहे. बाकी कुठं नाही. अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
महाराष्ट्र कसा सहन करत होता?
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, विरोधक वेदांताबद्दल बरेच बोलतात. आमचे आशिष शेलार कवी आहेत. पुढे ते म्हणाले की, त्या माणसाला अडीच वर्षे मिळाली. महाराष्ट्र कसा सहन करत होता, मला कळतं नाही. असा टोला यावेळी राणेंनी ठाकरेंना लगावला.
तू राज्याचा मुख्यमंत्री आहेस. मग, झालास का मुख्यमंत्री
काही येत नाही. 39 वर्षे जवळून पाहिलं त्या माणसाला. काही येत नाही. केंद्रीय अर्थमंत्री मुंबईत एका डिबेटमध्ये आले. पत्रकारांनी एक प्रश्न विचारला. बजेटमध्ये एक महसुली, राजकोषीय तुट आहे. ती वाढत चालली आहे.तेव्हा मला काही यातलं कळतं नाही. अरे पण, त्या केंद्राच्या आहेत. तू राज्याचा मुख्यमंत्री आहेस. मग, झालास का मुख्यमंत्री, अशी टीकाही राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
साहेबांच्या नखाची सर नाही
आता रोज फक्त शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीका करतात. अरे तू होतास तेव्हा काय केलं ते सांग ना बाबा. साहेब साहेब होते. साहेबांच्या नखाची सर नाही हो या माणसाला. बाळासाहेब आग होते. या माणसाला कोळसा नाही म्हणू शकत, अशीही विखारी टीका देखील त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.