शिवसेना ठाकरे गटाची सध्या शिवसंवाद यात्रा सुरू आहे. ठाकरे गट नेते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात सध्या ही यात्रा राज्यभराचा दौऱ्यावर आहे. त्यातच ही यात्रा काल औरंगाबादमध्ये होती. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या या यात्रेत गोंधळ झाल्याची घटना समोर आली. रमाई जयंतीनिमित्त काल मिरवणूक निघाली होती. त्यावेळी आदित्य ठाकरेंची सभा सुरु होती. मिरवणुकी डीजे बंद करण्याच्या कारणावरून हा गोंधळ झाला. या गोंधळावरून आता राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटावर या गोंधळाचा आरोप लावण्यात येत आहे. यावरूनच आता भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
काल झालेल्या आदित्य ठाकरेंच्या सभेतील गोंधळावर बोलताना निलेश राणे म्हणाले की, हा आदित्य इतका बदमाश आहे की स्वतःच्या हितासाठी तो कोणालाही विकू शकतो. आजोबांचा पक्ष यांनी रसातळाला नेला, खरा राग सगळ्यांचा ह्याच्यावर आहे तरी हा निर्लज्ज्यासारखा फिरत असतो. चौकशीत माहिती पडेल हा हल्ला यानेच घडवून आणला आहे, स्वतःचं संरक्षण वाढवण्यासाठी, हा एक नंबर नीच आहे. अशी विखारी टीका त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, आदित्य सारखा घाबरट आणि पुळचट दुसरा नाही, अरे तुला संरक्षणाची एवढी भीती वाटते तर घरातून बाहेर का पडतो. स्वतःहून हल्ला करायला लावायचा आणि मग पोलीस संरक्षण वाढवून मागायचं. तुम्ही ठाकरे ना मग तुम्हाला पोलीस का लागतात?? हा हल्ला याच्याच लोकांनी घडवून आणलाय याचं संरक्षण वाढवण्यासाठी. असा देखील गंभीर आरोप निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.