आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी आज सकाळी ईडीने छापेमारी केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच गदारोळ सुरु झाला. या छापेमारीनंतर मुश्रीफ यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून या कारवाईचा निषेध नोंदवला जात होता. अनेक नेत्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना टार्गेट करायचं ठरवलंय की काय, अशी शंका मुश्रीफ यांनी व्यक्त केली होती. त्यावरच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत मुश्रीफ यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी आज सकाळी ईडीने छापेमारी केली. त्यावर बोलताना सोमय्या म्हणाले की, भ्रष्टाचार करताना, पैसे खाताना हसन मुश्रीफ यांना धर्म नाही आठवला!? ED ई डी नी हसन मुश्रीफ वर कारवाई केली तर आत्ता हसन मियां सांगतात की ते........ आहे. घोटाळेबाज कुठल्याही धर्माचे असो, कारवाई झालीच पाहिजे. अशी टीका सोमय्यांनी यावेळी त्यांच्यावर केली.
छापेमारीनंतर काय म्हणाले मुश्रीफ?
'चारच दिवसांपूर्वी कागल तालुक्यातील भाजपच्या एका नेत्यानं दिल्लीत अनेक चकरा मारून माझ्यावर कारवाई करावी यासाठी प्रयत्न केले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना ईडी कारवाईची माहिती दिली होती. अशा प्रकारे नाउमेद करण्याचं काम जे चाललेलं आहे, ते अतिशय गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा प्रकारे कारवाया होणार असतील तर त्याचा निषेधच झाला पाहिजे. आधी नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली. त्यानंतर माझ्यावर छापे पडतायत. आता किरीट सोमय्या म्हणतात, अस्लम शेख यांचा नंबर आहे. म्हणजे विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना टार्गेट करायचं ठरवलंय की काय, अशी शंका मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.