काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी दिली. एकीकडे नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर जल्लोष साजरी होत असताना दुसरीकडे तर दुसरीकडे आता या निर्णयाचा विरोध होताना देखील दिसत आहे. दरम्यान, या नामांतराविरुद्ध आज खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली. मात्र, त्यावेळी या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावरूनच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या उपोषणात औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले. त्यानंतर यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहे. त्यावरच बावनकुळे यांनी ट्विटरवरून भाष्य केले आहे. ते म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकलेत. शिवरायांच्या पावन भूमीत औरंग्याचं समर्थन कशासाठी? औरंग्याचं तुष्टीकरण करणाऱ्या प्रवृत्तीचा बीमोड करण्याची गरज आहे. उध्दवजी ठाकरे तुम्ही औरंग्याच्या तुष्टीकरणावर काही बोलणार की मूग गिळून गप्प बसणार? अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.