राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळातून वादग्रस्त विधानाचे देखील सत्र सुरुच आहे. त्यातच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प अधिवेशनात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना आसाममध्ये लोक कुत्रे खातात असं वक्तव्य प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलं होते. यावरूनच आसाम विधानसभेत जोरदार गोंधळ झाला. विरोधासोबत बच्चू कडूंच्या अटकेचीही मागणी यावेळी करण्यात आली. यावरच आता बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करत माफी देखील मागितली आहे.
'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले बच्चू कडू?
आसाम विधानसभेत झालेल्या गोंधळावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, नागालँडमधील लोक कुत्रे खातात. मला वाटलं आसाममधील लोक कुत्रे खातात. दोन्ही राज्ये जवळपासच आहेत. माझ्याकडून चुकून आसाम नाव घेतले गेल, तिथं नागालँड म्हणायला हवे होते. एवढीच माझी चूक आहे. यामुळे त्या राज्यातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी माफी मागतो. असे ते यावेळी म्हणाले.
नेमकं काय केले होते बच्चू कडू यांनी वक्तव्य?
महाराष्ट्रातले सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथे त्यांना किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचं मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसे तिकडचे लोक श्वानाचं मांस खातात. या श्वानांचा व्यापार होईल. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली. असे ते विधानसभेत म्हणाले होते.