मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी आणि निर्यातदार व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना हिवाळी अधिवेशनात चांगलच घेरलं. तर, बच्चू कडूंनी देखील विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारला कांदा निर्णयावरुन चांगलेच सुनावले आहे. इथे बसायला लाज वाटते, अशा शब्दात कडू यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. मोदींच्या मेक इन इंडियात कांदा बसत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, बरेच आमदार पक्षाची भूमिका घेऊन बोलतात. पण, आता शेतकऱ्याच्या बाजूने बोललं पाहिजे. शेतकऱ्याला घामाची किंमत मिळत नाही. मग भाजप असो किंवा काँग्रेसवाले असो कोणाच्यात धमक नाही. काँगेस आता आंदोलन करत चांगलं आहे. स्वामीनाथ आयोगाचं कोणीच ऐकलं नाही. शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. इथे बसायला लाज वाटते. कोणी पक्षाच्या बाजूने बोलू नका. तिकीट आहे म्हणून बाजू घेऊ नका. आम्ही कोणी पक्षाच्या विरोधात बोलत नाही. सरकारच्या धोरणांनी आम्हाला मारलं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना जातीत आणि धर्मात गुंतवून ठेवलं आहे. भगव्यात आणि हिरव्यात अटकवून ठेवलं. शेतकऱ्यांच्या धानाला किंमत का देत नाही? मोदींच्या मेक इन इंडियात कांदा बसत नाही का? कांद्याने अटल बिहारी यांचं सरकार पाडलं. खाणाऱ्याचा विचार केला जातोय, असेही बच्चू कडू यांनी म्हंटले आहे. अध्यक्ष महोदय (तालिका अध्यक्ष चेतन तुपे) सारखी बेल का वाजवत आहात? तुम्हाला ही पक्षाचं बंधन आहे का, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.