Assembly Election Result : चार राज्यांचा निकाल रविवारी जाहीर होतो आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांत मतमोजणी होणार आहे. उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर केंद्राबाहेर सीसीटीव्ही, पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, चारही राज्यांतील बड्या नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. तर, निकालाआधी नेत्यांची आणि मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
मध्य प्रदेशमध्ये निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 2018 मध्ये मतदारांनी कॉंग्रेसला 114 जागांचा कौल दिला होता. तरीही भाजपनं मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन कमळ राबवून कमलनाथांचं सरकार पाडलं होतं. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनीही भाजपची वाट धरल्यानं भाजपची ताकद मध्यप्रदेशमध्ये वाढली आहे.
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत विधानसभा निवडणुकीचं मतदान झालं. एकूण 90 जागांसाठी येथं काँग्रेस आणि भाजप या दोन मातब्बर पक्षांमध्ये लढत आहे. स्थानिक शेतकरी बघेल यांच्यावर खूश असल्याचं माय एक्सिस पोलच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्याआधीच एक्झिट पोलने सर्वांच लक्ष वेधलं. 2 वेळा संधी दिल्यानंतर चंद्रशेखर राव यांच्या विरोधात बदलाचे वारे वाहत आहेत, असं एक्झिट पोलवरून दिसतं. बीआरएस, काँग्रेस आणि भाजप यांच्या खात्यात ज्या जागा जातांना दिसत आहेत. त्यानुसार तेलगंणात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी जोरदार रस्सीखेच होणार हे नक्की.
राजस्थानची निवडणूक ही मुख्यत्वे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. यावेळी राजस्थान काँग्रेसला थोडं कठीण असल्याचं सांगितलं आहे. काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात उभे असलेले बंडखोर आणि सचिन पायलट यांच्या नाराजीची मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागण्याची शक्यता आहे.