मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी आज उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीनंतर नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सीबीआय, ईडीचा वापर करून बहुमत, लोकांचं सरकार त्यांनी पाडलं. जर सरकार बनलं नाही तर मग आमदार तोडायचे. हा अहंकार आहे, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मी सगळ्यांना धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला कुटुंबाचा भाग बनवला आहे. दिल्लीच्या लोकांनी अधिकारांसाठी लढाई लढली. मोदी सरकारने आमच्या सगळ्या शक्ती काढून घेतली. ज्या दिवशी निकाल आला त्याच्या 8 दिवसात अध्यादेश जारी केला आणि अधिकार काढून घेतले. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला मानत नाही असा याचा अर्थ होतो. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना शिव्या देतात, त्यांच्या विरोधात मोहीम चालवतात. सर्वोच्च न्यायालय काहीही निर्णय देऊ देत आम्ही मानणाणार नाही असा त्यांचा स्वभाव आहे, असे टीकास्त्र अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर सोडले आहे.
शिवसेना सगळ्यात जास्त सहन करत आहे. सीबीआय, ईडीचा वापर करून बहुमत, लोकांचं सरकार त्यांनी पाडलं. जर सरकार बनलं नाही तर मग आमदार तोडायचे, अध्यादेश काढायचे हाच प्रयत्न आहे. अध्यादेश काढून त्यांनी आमच्या शक्ती काढून घेतल्या. हा अहंकार आहे आणि त्याचा परिणाम आहे. दिल्लीच्या लोकांची उद्धव ठाकरे यांना साथ दिली आहे.
पंजाबमध्ये बजेट सेशन होणार नाही, असं राज्यपाल यांनी सांगितलं. असंच आहे तर केवळ पंतप्रधान आणि राज्यपाल बसवा. निवडणुका घेतातच कशाला, असा सवाल केजरीवालांनी मोदी सरकारला विचारला आहे. शिवसेनेने आम्ही वचन दिलं आहे संसदेत जेव्हा हा मुद्दा येईल तेव्हा ते आम्हाला समर्थन देतील, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी निवडणुकाबाबत भीती व्यक्त केली आहे. आजपासून आपण सत्ताधाऱ्यांना विरोधी म्हटलं पाहिजे. गेल्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्वाचे निकाल दिले आहेत. आपच्या संदर्भात जो निर्णय दिला तो लोकशाहीसाठी आवश्यक होता. पण केंद्राने अध्यादेश आणला. राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. फक्त केंद्रात निवडणुका होतील, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.