राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच या गोंधळादरम्यान आज पहाटेपासूनच राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह नातलगांवर ईडीने छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीवरून राज्यात सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. यावर प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते, विरोधीपक्ष नेते यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
हसन मुश्रीफ यांच्यासह नातलगांवर झालेल्या ईडीच्या छापेमारीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, अशाप्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचं असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. तर फक्त ठरवून काही पक्षांवर अशी कारवाई करणे देखील योग्य नसल्याचं अजित पवार म्हणाले. ठाकरे गटातील राजन साळवी, नितीन देशमुख, वैभव नाईक यांच्यावर राज्यसरकारच्या अंतर्गत येणाऱ्या तपास यंत्रणाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे याला राजकीय रंग आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाहक त्रास कोणाला होता कामा नाही. अनिल देशमुखांवर कारवाई झाली पण कोणतेही पुरावे मिळाले नाही. संजय राऊत यांच्यासोबत देखील असेच झाले. हे सर्व प्रकार देशाला आणि राज्याला परवडणारे नाही, असे अजित पवार म्हणाले.
छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया
माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने फोनवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासली जात आहे. माझ्यावरील ईडीच्या या कारवाई विरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांताता राखावी. तसेच, कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू नसे. कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. असे हसन मुश्रीफ म्हणाले होते.