राज्यात सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर म्हणजेच गुजरातला गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक सुरु आहे. याच वादामध्ये आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातले प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातच परत गेले. आरटीआयमधून माहिती समोर आलीय. अठरा महिने मुख्यमंत्री राज्यात नसताना काय प्रकल्प येणार, आत्ताचे मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री 18-18 तास काम करत आहेत. कुठंला उद्योगपती पैसे गुंतवणार. उद्योग आणण्यासाठी इच्छाशक्ती लागते त्या उद्द्योगासाठी उपलब्धता पाहिजे असते. माविआच्या काळातील मुख्यमंत्र्यांना ही इच्छाशक्ती नव्हती. महाविकासआघाडी नेत्यांनी भांडाफोड करण्यापेक्षा आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात भाजप उत्तर देईल. खोटे बोलाल तर उत्तर देईल, असा इशारा यावेळी बावनकुळे यांनी दिला आहे.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी यांनी कितीही यात्रा केल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आमचे दोन्ही नेते बुलेट ट्रेनसारखे काम करता आहेत. मताच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करायला तयार आहेत, असा टोला यावेळी बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.