संजय देसाई, सांगली | मी भाजपचा खासदार असल्यानं ईडी मागे लागणार नाही, असं वक्तव्य सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनी केलं आहे. या विधानाचा समाचार आता जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे.
सांगली शहरातील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर पूल निर्माण होत आहे. या पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. त्यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी कांग्रेस व भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयर्विन पुलाला समांतर होणाऱ्या नवीन पुलामुळे महापुराच्या काळात नागरिकांना थोडाफार दिलासा मिळेल,अशी अपेक्षा पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच भाजपाकडून नवीन पुलाच्या श्रेयावादाला आपल्या खास शैलीतुन टोला लगावला आहे. त्याचबरोबर ईडीबाबत खासदार संजयकाका पाटील यांनी केलेले विधान बरोबर असून सत्तेचा दुरुपयोग कसा झालेला आहे,याचे वर्णन केले आहे,असा मतही मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले संजय काका पाटील ?
महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या नेत्यांमागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मात्र मी भाजपचा खासदार असल्यानं ईडी मागे लागणार नाही, असं वक्तव्य सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनी केलं आहे. तसंच आम्हाला लोकांसमोर दिखावा करावा लागतो. कर्ज काढून 40 लाखांच्या गाड्या वापराव्या लागतात, असंही संजयकाका पाटील म्हणाले आहेत.