सूरज दहाट | अमरावती : शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” राबविण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे रात्री११वाजता झाला.
यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकरी शैलेश सावलकर यांच्या निवासस्थानी चक्क मुक्काम केला. व शेतकऱ्यांसोबत अब्दुल सत्तार यांनी पात्रवाडीवर बसून रानभाजीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांनी रात्री १२ वाजता दोन तास शेतकऱ्यांसोबत सामूहिक बैठक घेतली. अब्दुल सत्तारांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर रातभर त्यांनी शेतकऱ्यांच्या घरी कुठल्याही प्रकारचा लावाजमा न दाखवता आराम केला.
पहाटे पाच वाजल्यापासूनच कृषीमंत्र्यांचा मेळघाटात दौरा सुरू
कृषी मंत्री सत्तार यांचे काल रात्री अकराच्या सुमारास साद्राबाडी येथे आगमन झाले. त्यांनी गावातील शैलेंद्र सावलकर या शेतकरी बांधवाच्या घरी मुक्काम केला. आगमनानंतर गावकऱ्यांची त्यांनी संवाद साधून विविध विषयांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे आज पहाटे ५ वाजेपासूनच सावरकर तसेच इतर शेतकरी बांधवांसोबत चर्चा करून शेतीविषयक अडचणी आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती जाणून घेत आहेत. गावातील प्रत्येक घराला भेट देऊन ते गावकरी बांधवांची संवाद साधत आहेत व त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत.