येत्या 21 तारखेला वटपौर्णिमा आहे. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला जी पौर्णिमा असते तिला 'वटपोर्णिमा' किंवा 'वटसावित्री' म्हणतात. माता सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत मिळवले, ज्या ठिकाणी सत्यवानाचे प्राण परत मिळाले तेथे वटवृक्षाचे झाड होते, त्यावेळी माता सावित्रीने त्या वडाच्या झाडाची मनोभावे व श्रद्धापूर्वक पूजा केली होती, त्या प्रसंगाची आठवण कायम ठेवून आपल्या प्रपंचात सुख लाभावे व आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेला वडाची पूजा करत असतात.
पूजा साहित्य:-
हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी (काळी पोत), अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ.
वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी. वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या. 5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी. सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.