महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद सुरू असतानाच काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिल्लीला गेले होते. याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. जागा वाटपामध्ये आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मोठा निर्णय घेतला आहे. जागावाटपामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बाजूला करून आता समन्वयाची जबाबदारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये विदर्भातील जागांवरून सातत्याने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत असल्याने जागावाटपाची चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही. यामुळे महाराष्ट्रातल्या उमेदवार निवडीसाठी आणि मविआतल्या वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस हायकमांड आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
तमिल सेल्वन देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झाले आहेत. तमिल सेल्वन यांना सायन कोळीवाडातून उमेदवारी देण्यात आली आहे. तमिल सेल्वन यांचे तिकिट कापलं जाण्याची चर्चा होती. पण उमेदवारी दिल्यानं सेल्वन यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत.
कॉंग्रेसची 96 जागांबाबत चर्चा पूर्ण झाली असून राज्यात महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंगळवारी पुन्हा चर्चा करणार आहे. चर्चेनंतर उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी दिली आहे.
सोयगाव तालुक्यात एका आठवड्यापासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. आज देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरूआहे. बोरमाळ तांडा येथील जंगलात शेळ्या चारत असताना एका तरुणाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. तसेच यात 3 शेळ्या देखील ठार झाल्याचं समोर आलं आहे, तर या तरुणाच नाव अजय नथ्थु राठोड असून तो 17 वर्षांचा होता. अशीच एक आणखी घटना देखील घडली आहे ज्यात 16 वर्षाची अश्विनी मच्छिंद्र राठोड शेतातून घरी परतत असताना तिच्या देखील अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला आहे. तर ही घटना हनुमंतखेडा येथे घडली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्यासाठी कट आखण्याच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांचा कॅम्प पोलिसांनी उध्वस्त केला आहे. छत्तीसगडच्या नारायण जिल्ह्याच्या सीमेकडील गडचिरोलीच्या जंगलात ही चकमक उडाली असून त्यात 5 नक्षलवादी ठार झाले आहेत. जंगल परिसरात अजूनही शोधमोहीम सुरूच आहे. तसेच मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचं काम देखील सुरूआहे. जिल्हा पोलीस दलाच्या सी-60 पथकाच्या 22 तुकड्या आणि सीआरपीएफच्या 2 तुकड्यांनी ही कारवाई केलीआहे.
भांडूप भवानी नगरमध्ये मासेकोळी समाज वसाहतीत कांजूरमार्ग पोलिस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ०१ गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र व ०१ जिवंत काडतुस तसेच एकुण ३८ किलो ७०० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला असल्यामुळे दाखल करण्यात आला आहे. यांची एकूण किंमत १६,४९,४०० रुपये असून यात दोन आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. तर यात भांडूप भवानी नगरमधील मासेकोळी समाज वसाहतीत कोणताही शासकिय कागदोपत्रांचा परवाना नसताना हे कृत्य करण्यात आलं होत. तसेच याबाबत क्राईम ब्रांच ७ पोलीस अधिक तपास करत आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. पाचव्या यादीत 16 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीमधून मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ऐरोलीतून विक्रात गोळे, जोगेश्वरी पूर्वमधून परमेश्वर रणशुर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मालाडमधून अजय रोकडे, अंधेरी पूर्वमधून अॅड संजीवकुमार कलकोरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. घाटकोपर पश्चिममधून सागर गवई, घाटकोपर पूर्वमधून सुनीता गायकवाड तर चेंबूरमधून आनंद जाधव यांना उमेदवारी जाहीर मिळाली आहे.
भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दररोज सायंकाळी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक हिरावून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीसांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेची उमेदवारी जाहीर होताच अर्जाची तारीख ठरली आहे.
मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. राजू पाटील आणि अविनाश जाधव यांच्या नावाची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकृत घोषणा केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्याकडे कोकणचा अहवाल पाठवला असून लवकरच उमेदवार जाहीर करतील चिपलूण संगमेश्वर.मतदार संघातून इच्छुक असलो तरी राज ठाकरे जो आदेश देतील तो पाळणार आहे त्यांच्या उद्घाटन झालेले चिपलूण शहरातील मनसेचे दुसरे कार्यालय का बंद झाले याबाबत आपणास काही एक माहिती नसल्याची प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी दिली.
विधानसभेची बिगुल वाजल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर या ठिकाणी महायुतीचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी सुरू आहे. या महायुतीच्या मेळाव्याची जय्यत तयारी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून या मंचावरून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर होते का याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.