काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उद्या अर्ज भरणार आहेत. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येणार असून यावेळी सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.
बोरीवली मतदारसंघात भाजपमध्ये पक्षांतर्गत रस्सीखेच सुरु असून विद्यमान आमदार सुनील राणे यांचे तिकीट कापण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. गोपाळ शेट्टी, शिवानंद शेट्टी, स्नेहल शाह आणि शरद साटम यांची नावे चर्चेत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
दिंडोरी विधानसभेत महायुतीत बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेचे धनराज महाले निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. धनराज महाले 24 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे.
जुन्नर विधानसभेतील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे सत्यशील शेरकर पवारांची भेट घेणार आहेत. मविआत जुन्नरची जागा पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सकारात्मक चर्चा झाल्यास शेरकर हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे.
जुन्नरमधून अतुल बेनकेंची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. अतुल बेनके यांना राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म मिळाला. बेनके यांची उमेदवारी फायनल झाली असून 24 ऑक्टोबरला अतुल बेनके आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.
बडनेरा मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आलेले युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा हे पुन्हा चौथ्यांदा युवा स्वाभिमान संघटनेकडून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. 29 तारखेला युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने रवी राणा उमेदवारी अर्ज दाखल करणार.
कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली असून परतीच्या पावसानं कोल्हापुरात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. वादळी वाऱ्यासह कोल्हापुरात तुफान पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पुण्यात खासगी वाहनात कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून ही मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. या वाहनामध्ये पाच कोटी रुपयांची रोकड पोलिसांना आढळून आली.
शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांची आज यादी जाहीर होणार आहे. रायगडसह सांगोल्यातील 8 जागा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील 4 आणि सांगोल्यासह साधारण 8 जागांवर शेकाप लढण्याची शक्यता आहे. जयंत पाटील दुपारी 3 वाजता उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
हिंगोली जिल्ह्यात अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, हिंगोलीच्या वसमत कळमनुरी तालुक्यातील अनेक गावा मध्ये आज सकाळी पाच वाजून 52 मिनिटांनी भूकंपाचे सोम्य जाणवले आहेत. भूकंपाचं मुख्य केंद्रबिंदू नांदेड असून 3.8 रिश्टर स्केल मीटर भूकंपाची नोंद भूकंप भूमापक केंद्राकडे झाली आहे. भूकंपाचे मुख्य केंद्रबिंदू नांदेड असल्याने नांदेड सीमा वरती भागातील कळमनुरी वसमत या भागातील अनेक गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
आमदार अमोल मिटकरी देवगिरीवर दाखल झाले आहेत. अमोल मिटकरींना अजित पवारांकडून बोलावणं आल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभेचा रणसंग्राम आजपासून सुरु होणार असून उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीची खरी प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे. यातच अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असून 26 आणि 27 ऑक्टोबरला शासकीय सुट्टी असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना अवघे 6 दिवस मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी लांबणीवर पडणार असल्याची चर्चा सुरु असून ही यादी 25 ऑक्टोबरला जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या काँग्रेसच्या यादीच 50पेक्षा जास्त नावं असल्याची माहिती मिळते आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 63 जागांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
छत्तीसगड सीमेवरील कोपर्शीच्या जंगलात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती मिळत असून 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना मोठं यश आलं आहे.
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार असून 29 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
आज मनसेची पहिली यादी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळत असून यामध्ये अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचं तसेच संदीप देशपांडे, स्नेहल जाधव यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची मुंबईत पुन्हा जागावाटपाबाबत बैठक होणार आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याचे पाहायला मिळत आहे.