हिंदू धर्मात अनेक परंपरा आणि रुढी आहेत, ज्याबद्दल अनेकांना फारसं काही माहिती नसतं. पण सगळे लोक करतात किंवा शास्त्र असतं ते असं म्हणत अनेक लोक त्या परंपरा पार पाडत असतात. त्यांपैकी एक सर्वात महत्वाची आणि बहुचर्चीत परंपरा म्हणजे जावळ करण्याची. लहान मुलांचे जावळ करण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. फक्त वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक ते वेगवेगळ्या पद्धतीने करतात. कुठे जावळ केल्यावर मिरवणूक काढली जाते, तर कुठे जावळ केल्यावर मोठा कार्यक्रम ठेवला जातो. तर कुठे मामाच्या मांडीवर बसून ही प्रथा पार पाडली जाते.
त्यांपैकी काहींकडे मुलगा आणि मुलगी दोघांचे जावळ करतात, तर काही लोक फक्त मुलांचे जावळ केले जाते. परंतु असे असले तरी, मुळात हे जावळ का केले जाते? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? चला या मागचं कारण जाणून घेऊ.
हे आहे जावळ करण्यामागचे शास्त्रीय कारण
नऊ महिने आईच्या उदरात राहून मूल जेव्हा या जगात येते, तेव्हा त्याच्या डोक्यात अनेक जंतू असतात. हे जंतू आणि बॅक्टेरिया शॅम्पूनेही काढता येत नाहीत. यामुळे, मुलांचे केस काढले जातात. ज्यामुळे हे सर्व जंतू आणि बॅक्टेरिया निघून जातात.
मुलांच्या डोक्यावरचे केस काढल्याने त्यांच्या शरीराचे तापमानही नियंत्रित होते. मुलाचे जावळ केल्यावर त्याला फोड, मुरुम, जुलाब यांसारख्या आजारांपासून मुक्ती मिळते. त्याच वेळी, त्याचे डोके देखील थंड राहते.
जावळ केल्यावर, मुलाच्या डोक्यावरील सर्व केस काढले जातात, ज्यामुळे सूर्यप्रकाश थेट त्याच्या डोक्यावर पडतो. हा सूर्यप्रकाश मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे पेशी कार्यान्वित होतात आणि नसांमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो.
जावळ केल्याने मुलांना सहज दात येतात असा एक वैज्ञानिक समजही आहे. सामान्यतः जेव्हा मुलाचे दात येतात, तेव्हा त्याला जुलाब होऊ लागतो. यासोबतच तापही येतो. पण जावळ केले तर दात येण्यास फारशी अडचण येत नाही.