डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
दीपावलीच्या आगमनाची आपण सगळे वाट पाहतो आहोत. कोणताही उत्सव, मंगल कार्य, समारंभ असो, आपल्याकडे दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावण्याची पद्धत असते. नकारात्मक शक्तीतरंग रोखून धरण्याची शक्ती या तोरणात असते अशी या मागची धारणा. पण या शिवाय आंब्याची पानं औषधातही वापरली जातात. आयुर्वेदात पंचपल्लव या गणात आंब्याच्या पानांचा अंतर्भाव केलेला आहे. ही पानं तुरट चवीची असतात. आजकाल हिरड्यांमधून रक्त येणं, पूरळ तयार होणं, हिरड्या सैल होणं, या सर्वामुळे दुर्गंधीचा त्रास होणं, या तक्रारी अनेकांना जाणवतात. या सर्व तक्रारींवर आंब्याची पानं औषधाप्रमाणे उपयोगी पडतात.
यासाठी दोन-तीन कोवळी आंब्याची पानं घ्यावीत, विड्याचं पान जसं आपण दुमडून तोंडात टाकतो, तशी ही पानं दुमडून तोंडात टाकावीत आणि हळूहळू चावावीत. २-३ मिनिटांनी उरलेला चोथा टाकून द्यावा. दिवसातून एक किंवा दोन वेळा हा उपाय करता येतो. दातांचं शिवशिवणं, संवेदनशील या तक्रारी सुद्धा या उपायानी कमी होताना दिसतात. आंबा खाल्ला की त्याच्या आतली कोय आपण फेकून देतो, पण ही कोय जर निखार्यावर भाजून घेतली आणि फोडली, तर तिच्या आत जी गुठळी निघते, ती जुलाब थांबवण्यास मदत करणारी असते.
यासाठी सहाणेवर थोडं ताक घ्यावं, त्यात गुठळी उगाळून पेस्ट तयार करावी. मोठ्यांसाठी अर्धा चमचा आणि लहानांसाठी पाव चमचा अशाप्रकारे ही पेस्ट घेतली असता जुलाब कमी होतात असं दिसतं. अगदी तान्हं बाळ असेल, तर त्याला या पेस्टचा पोटावर फक्त लेप केला तरी पुरतो. अशाच आपल्या रोजच्या वापरातल्या वनस्पतींचे औषधी गुणधर्म जाणून घेण्यासाठी पाहत राहा,