Bachhu Kadu: 4 नोव्हेंबरला मोठा बॉम्ब फोडणार, बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य
राज्यात परिवर्तन महाशक्तीचं सरकार येणार असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. 'महायुतीसह मविआतील अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 4 नोव्हेंबरला मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यानं महायुतीला सोडचिठ्ठी दिली असल्याचे स्पष्टीकरण यावेळी कडू यांनी दिलं आहे.
आमचीच पहिली आघाडी असून महायुतीत भाजप शिवसेनेचे पटणार नाही. अजित दादांना दोघेही चालत नाहीत. आणि महाविकास आघाडीत नाना पटोले हे शिवसेनेचे काम करणार नाहीत. उरलं सुरले उणे दुणे संजय राऊत काढतील त्यामुळे आमची महाशक्तीचे सरकार येईल असा दावा परिवर्तन महाशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे. अकोल्यातील अकोट मतदारसंघात परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार ललित बहाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, महायुतीसह महाविकास आघाडीतील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. चार तारखेला मोठा बॉम्ब फोडणार आहोत. याच्या आवाजाने काँग्रेससह युतीचेही कान बंद होतील असा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे. तर शेतकरी आणि मजुरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांचा गणपती करू असे बच्चू कडू म्हणाले. तर ज्यांनी शेतकरी आणि मजुरांना दूर केले. म्हणून त्यांच्यापासून आपण दूर झालो असल्याचे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी महायुतीची साथ सोडण्याबाबत दिले आहे.