Rohit Sharma On Rahul Dravid
Rohit Sharma Google

Rohit Sharma: रोहित शर्मानं राहुल द्रविडसाठी लिहिली भावनिक पोस्ट, म्हणाला; "माझ्या बालपणीच्या..."

भारतानं टी-२० वर्ल्डकप २०२४ चा किताब जिंकला. त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर क्रिकेटप्रेमींनी कौतुकाचा वर्षाव केला. अशातच रोहित शर्माने राहुल द्रविडबाबत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षानंतर पुन्हा एकदा टी-२० वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला. २०२४ मध्ये झालेल्या आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक टूर्नामेंटच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला होता. त्यानंतर आयपीएलची रणधुमाळी संपताच भारतानं टी-२० वर्ल्डकप २०२४ चा किताब जिंकला. त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर क्रिकेटप्रेमींनी कौतुकाचा वर्षाव केला. अशातच रोहित शर्माने राहुल द्रविडबाबत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. मी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी अजूनही योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करत आहे, असं रोहितनं म्हटलं आहे.

रोहितने शर्माने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर म्हटलं की, मी बालपणी इतर लोकांप्रमाणेच द्रविडलाही पाहत आलो आहे. मी याबाबत योग्य पद्धतीने भावना व्यक्त करू शकत नाही. भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझ्या बालपणाच्या दिवसांपासून मी कोट्यावधी लोकांप्रमाणे तुमचाही आदर केला आहे. मला तुमच्यासोबत इतक्या जवळून काम कऱण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मानं म्हटलं की, राहुल द्रविड क्रिकेटचे दिग्गज आहेत. मी द्रविड यांच्याकडून खूप गोष्टी शिकलो असून त्या सर्व गोष्टी माझ्या कायम लक्षात राहतील. तुम्ही या खेळाचे दिग्गज आहात, पण तुम्ही सर्व कौतुक आणि यश दरवाजातच सोडलं आणि आमचे प्रशिक्षक म्हणून रुजु झाले. मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे. माझी पत्नी तुम्हाला माझी वर्क वाईफ म्हणून संबोधते. मी भाग्यवान आहे की, मला तुम्हाला असं म्हणण्याची संधी मिळाली.

टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या फायनलनंतर राहुल द्रविडचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला आहे. द्रविडच्या कोचिंगमध्ये भारताने १७ वर्षानंतर टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात विराट कोहली आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ७ विकेट्स गमावून १७६ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळं भारताने दक्षिण आफ्रिकेला फायनलच्या सामन्यात ७ धावांनी पराभूत केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com