Vishal Patil : सांगली ही काँग्रेसचीच आहे आणि ती आपण सोडायची नाही; काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना लिहिलं पत्र

Vishal Patil : सांगली ही काँग्रेसचीच आहे आणि ती आपण सोडायची नाही; काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना लिहिलं पत्र

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच सांगली मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात तिढा पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहत निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे.

विशाल पाटील यांनी पत्रात लिहिलं की, मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे. स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व.आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मा. विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत.

तसेच त्यांनी पुढं लिहिलं की, या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे कि, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू.... असे विशाल पाटील यांनी पत्रात लिहिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com