मुख्यमंत्रि‍पदाच्या दाव्यावरुन उद्धव ठाकरे यांची माघार

मुख्यमंत्रि‍पदाच्या दाव्यावरुन उद्धव ठाकरे यांची माघार

उद्धव ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेवरुन शिवसेनेने त्यांच्यावर पलटवार केला आहे. त्यामुळे आता मविआमध्ये उद्धव ठाकरे यांची दावेदारी मोडीत निघाली का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापलथ झाली. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून राज्यात महायुतीचे नवे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून पाय उतार व्हावे लागले होते. तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या विचारसरणीशी प्रतारणा करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमके शिजतंय तरी काय असा सवाल विचारला जात आहे.

मुख्यमंत्रि‍पदाच्या दाव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत आग्रही असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आता एक पाऊल मागं घेतलं आहे. मविआत उद्धव ठाकरे यांची दावेदारी मोडीत निघाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या माघारीवरुन शिवसेनेनं ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले आहेत.

महाविकास आघाडीचा भावी मुख्यमंत्री म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता माघार घेतली आहे. शरद पवार आणि काँग्रेसनं तीव्र विरोध केल्यानंतर उद्धव ठाकरेंची आता भाषा बदलली आहे. मुख्यमंत्रि‍पदाची लालसा नाही पण जनतेच्या आयुष्याची चिंता असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. संजय राऊतांनी मात्र उद्धव ठाकरे हेच भावी मुख्यमंत्री असल्याची टेप कायम ठेवली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ठाकरेंच्या दावेदारीला विरोध कायम असल्याचं अप्रत्यक्षपणं सांगत मुख्यमंत्रि‍पदासाठी लढाई नसल्याचं स्पष्ट केलं.

शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या माघारीवर टीकेचे बाण सोडलेत. शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. "हीच का ती वज्रमुठ ? ज्यांना साधं आरतीचं ताट उचलता येत नाही? ते राज्य सांभाळायची भाषा करतायत ! बाकी, झेपत नाही तर कशाला हे प्रयोग करायचे?" असे ट्वीट शीतल म्हात्रे यांनी केले आहे.

तर संजय शिरसाटांनीही उद्धव ठाकरे यांच्या माघारीवरुन टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या माघारीची मोठी राजकीय किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. महाविकास आघाडीचा प्रमुख नेता या प्रतिमेला या माघारीनं तडा गेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com