Uddhav Thackeray PC : 'देशात नंगानाच सुरू, त्याला चाप लावा' ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आवाहन
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यादरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात नंगानाच सुरू, त्याला चाप लावा, आवाहन केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रामध्ये बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यावर न्यायालयाने मत मांडलं. शिवसेना गद्दारांच्या माध्यमातून आपल्याला दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट उघडा पडला. बेसूर चेहरा काल उघडा पडला'. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काहींनी फटाके वाजवले. भाजपने फटाके वाजवले समजू शकतो पण गद्दारांनी फटाके का वाजवले कळत नाही? सर्वोच्च न्यायालयाने पोपट ठेवला आहे, तो मेलेला आहे. विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे आता निर्णय आहे. महाराष्ट्राची बदनामी थांबली पाहिजे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
'न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवल आहे की उद्या ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केल असतं. म्हणजे हे सर्व बेकायदेशीर आहे. मी राजीनामा दिला ते योग्य केलं. मेलेला पोपट हातात घेऊन मिठू-मिठू काहीजण करत आहे. महाराष्ट्राची ही अवहेलना थांबली पाहिजे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करतो की, आपले मतभेद असतील पण आपल्याला देशात नंगानाच सुरु आहे त्याला चाप लावा. यामुळे आपली बदनामी होत आहे. असेही ठाकरे पुढे म्हणाले.