Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Monsoon Session: "...तो गाजर संकल्प असणार आहे"; उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला धरलं धारेवर

पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महायुती सरकारलं धारेवर धरलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Uddhav Thackeray Press Conference : पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महायुती सरकारलं धारेवर धरलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले, या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून काही घोषणा होण्याची शक्यता आहे. कदाचित उद्याच त्याबद्दल घोषणा होतील. साधारणत: प्रथा अशी असते की दरवर्षी केंद्रात आणि राज्यात अर्थसंकल्प सादर केला जातो. त्या अर्थसंकल्पाच्या अनुषगांने त्या योजना किंवा घोषणा त्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात. त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली असते. उद्या घोषणांचा जो काही पाऊस पडेल तो गाजर संकल्प असणार आहे. कारण निधी खर्चच होणार नाही. घोषणा आजपर्यंत खूप झाल्या. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो, असं यापूर्वीही मी म्हटलं आहे. या सरकारला थोड्या जरी संवेदना असतील, तर त्या घोषणांची पूर्तता किती झाली, हे त्यांनी खरेपणाने सांगावं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, या सरकारला खोटं सरकार म्हणतातच. हे दोन्ही सरकार महागळती सरकार आहे. हे लिकेज सरकार आहेत. ह्यांना लाज लज्जा काही नाही. आम्ही काही प्रश्न विचारल्यावर ते आमच्यावर आरोप करतात. संपूर्ण अधिवेशनात महाराष्ट्राच्या जनतेचं प्रश्न उपस्थित केले जातील. राज्यातील शेतकरी ही परिस्थिती भोगत आहेत. सरासरी पाहिलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यात आत्महत्या करतोय. घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं, तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की, राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.

राज्यात काय देशात असा शेतकरी नसेल, जो हेलिकॉप्टरने शेतात जातो आणि पंचतारांकीत शेती करतो. विशेषत: अमावस्या पोर्णिमेला वेगळं पीक काढतात, असं माझ्या कानावर आलं आहे. शेतकऱ्याची हालत गंभीर झाली आहे. पावसाने ओढ दिली आहे. पाऊस म्हणावा तसा सुरु झालेला नाही. महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये आजसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्याबद्दल यांना कुठेही संवेदना नाही.

जवळपास सव्वा सहा हजार आत्महत्या या दोन वर्षात झाल्या आहेत. साधारणत: रोज ९ शेतकरी आत्महत्या करत आहेत. विदर्भाती, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा वाली कुणी राहिला नाही. हा गाजर संकल्प आहे. गाजरं दाखवा आणि पुढे चला. आता ते चालणार नाही. आजपर्यंत यांनी ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी किती झाली, त्याची एक श्वेतपत्रिका काढा. पण मला खात्री आहे, ती श्वेतपत्रिका एक नुसता कागद असेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com