कोंबडे भाजपाच्या खुराड्यात बंदीवान आहेत, त्यांच्या मानेवर कधी सुरी फिरेल सांगता येत नाही; सामनातून हल्लाबोल
गजानन किर्तीकर यांनी जी नाराजी भाजपाबाबत बोलून दाखवली त्यावरुन आता ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, मिंधे गट म्हणतोय आम्ही लोकसभेच्या २२ जागा लढवू. म्हणजे भाजपाकडे त्यांनी तेवढ्या जागा मागितल्या, मात्र भाजपा त्यांना पाच ते सहा जागांचीही भीक घालायला तयार नाही. फडणवीसांच्या हातातील गाडीस ते कधीही अपघात घडवून मिंधे गटाची वाट लावतील हे सांगता येत नाही. ज्याच्या खांद्यावर हात ठेवायचा आणि त्याचाच खेळ खल्लास करायचा हे त्यांचे धोरण. म्हणूनच शिवसेनेने भाजपापासून लांब जाणेच पसंत केले. असे सामनातून म्हटले आहे.
तसेच मिंधे गटाच्या चाळीस कोंबड्या व १३ तुर्रेबाज कोंबडे भाजपाच्या खुराड्यात बंदीवान आहेत. त्यांच्या मानेवर कधी सुरी फिरेल सांगता येत नाही. शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी झालेली दिसते आहे. खुराड्यात आज दाणे घातले आहेत. आधी दाणा मग कापती माना! कीर्तिकर यांनी मान सांभाळावी. जो येतो तो या कुत्र्याच्या पेकाटात लाथ मारीत आहे.