sanjay raut
sanjay rautTeam Lokshahi

“…म्हणून फडणवीस हेसुद्धा तितकेच अपराधी आहेत”; सामनातून हल्लाबोल

मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीच्या (ED) विशेष न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा झटका
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीच्या (ED) विशेष न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा झटका दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते नवाब मलिक (Nawab Malik ) यांचे मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या टोळीशी संबंध असल्याचं प्राथमिक पुराव्यांवरुन स्पष्ट होत असल्याचं न्यायालयाने नोंदवलं आहे.

यासर्व प्रकरणावरुन आता जोरदार आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेनेने (Shivsena) आजच्या सामनातून या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष असेलेल्या भाजपला (BJP)इशारा दिला आहे. भाजपासोबतच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर निशाणा साधलाय.

दाऊद नक्की कुठे आहे हे आता रहस्यच आहे. दाऊद देशासाठी इतका खतरनाक आहे व त्याचे अंडरवर्ल्डचे जाळे असे पसरले असेल तर केंद्र सरकारचे गृहखाते काय करतेय? दाऊद पाकिस्तानात आहे व त्याचा ठावठिकाणा केंद्रीय गुप्तचर खात्यास माहीत असायला हवा. त्याच्या ठिकाणावर हल्ला करून भारताचा हा शत्रू कायमचा संपवायला हवा व तसे करण्यापासून केंद्र सरकारला कोणी रोखले आहे? अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला मारले तसे दाऊदला मारा, पण दाऊद जिवंत आहे की मेलाय हे येथील लोकांना माहीत नाही, पण तरीही दाऊदच्या नावाने त्यांची जपजाप कायम सुरू असते.

सोबतच शरद पवार (sharad Pawar ) हे देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांच्यावर गोपीनाथ मुंडे वगैरे लोकांनी दाऊद संदर्भात आरोप करून खळबळ उडवली, पण नंतर गृहखाते मुंडेंकडे येऊनही या आरोपांची चौकशी झाली नाही व तथ्यही समोर आणले गेले नाही. उलट विधानसभेत मुंडे म्हणाले होते की, विरोधकांना बदनाम आणि नामोहरम करण्यासाठी असे आरोप करावे लागतात. नवाब मलिक व महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या बाबतीत हे असेच आरोप गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्याशी वैयक्तिक वैर घेतले आहे व केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी पकडून ते वैयक्तिक वैर पुढे नेत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांतील अधिकाऱ्यांना ‘फतवे’ देण्याचे काम फडणवीस करतात, ही त्यांना आज मजा वाटत आहे, पण हाच खेळ भविष्यात त्यांच्यावर उलटू शकतो. असा इशारा शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून दिलाय.

फडणवीस हे पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते व गृहखाते त्यांच्याच ताब्यात होते. नवाब मलिक यांचे ‘डी’ गँगशी संबंध होते हे त्यांना तेव्हा का दिसले नाही व ‘डी’ गँगची पाळेमुळे फडणवीस यांनी तेव्हाच का खणून काढली नाहीत? मलिक यांचे दाऊद वगैरेंशी संबंध होते तर फडणवीस यांनी ते रॅकेट उद्ध्वस्त करायला हवे होते. त्यामुळे फडणवीस हेसुद्धा तितकेच अपराधी आहेत. नवाब मलिक व कथित ‘डी’ गँगचे संबंध दाखविण्यात आले ते काही आजचे नाहीत. मग तेव्हा हे लोक काय झोपले होते? फडणवीस यांच्या विरोधात नवाब मलिक यांनी हल्लाबोल करताच केंद्रीय तपास यंत्रणांचा पद्धतशीर वापर करण्यात आला व त्यास ‘डी’ गँगचा संदर्भ दिला.

“मुंबईतील अंडरवर्ल्ड व्यवस्थेचा अभ्यास भारतीय जनता पक्षाने काळजीपूर्वक केला पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणांना मारून मुटकून वैद्यबुवा करण्याचे काम केले जात आहे. मुंबईतील अंडरवर्ल्डचा बीमोड पोलिसांनी केला आहे. दाऊद ही कथा किंवा दंतकथा आज उरलेली नाही, पण भाजपा व केंद्रीय तपास यंत्रणा दाऊदच्या नावाने उद्योग करून दाऊदची विरासत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. यात त्यांचा स्वार्थ आहे. अबू सालेम तुरुंगात आहे, छोटा शकील बेपत्ता आहे, हसिना पारकरचे निधन झाले, दाऊदचा भाऊ इक्बाल हा तुरुंगात आहे, मग भाजपा किंवा केंद्रीय तपास यंत्रणा म्हणते ती ‘डी’ गँग आहे कोठे? ‘डी’ गँग ही राजकीय विरोधकांना बदनाम करण्यापुरतीच उरली आहे हे स्पष्ट झाले आहे,” असे शिवसेनेनं म्हटले आहे.

नवाब मलिक यांच्यावरील कारवाई ही वैयक्तिक सूडातूनच करण्यात आली. मलिक यांनी अशा काही प्रकरणांना हात घातला की, त्यामुळे भाजपाची वाट बिकट झाली. अनिल देशमुख व इतरांच्या बाबतीत तेच घडले, पण याच पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा काम करीत राहिल्या तर त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. फडणवीस किंवा भाजपाच्या फतव्यांनी कारवाया करणे यात ज्यांना मर्दुमकी वाटते ते स्वतःसाठी खड्डा खणत आहेत. असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com