Sanjay Raut: "पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला भरपूर मतं मिळाली, पण..."; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut Press Conference : पुणे, मावळ, पिंपरी-चिंचवड, बारामती, पुणे ग्रामीण या भागातील शिवसैनिकांचा हा शिवसंकल्प मेळावा आहे. गणेश कला क्रिडा मंदिरात हा मेळावा उद्या दिवसभर होणार आहे. 'चला जिंकूया' अशी त्या मेळाव्याची दिशा आहे. शिवसैनिकांना प्रेरणा मिळावी, आपण त्या ताकदीनं लढतोय, त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन व्हावं, त्यासाठी हा उद्याचा मेळावा आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याचं पुण्यात सकाळी आगमन झालं आहे. पुण्यात त्यांचे काही कार्यक्रम आहेत. उद्या दिवसभर ते त्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला मतं भरपूर मिळाली, पण दुर्देवानं यश मिळालं नाही, असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीला चांगलं मतदान झालं. काही जागा आम्ही जिंकल्या. पण आमची मावळची जागा थोड्या मतानं पडली. त्यानंतर सांगलीत आम्हाला यश प्राप्त झालं नाही. पण विधानसभेला आम्ही पुणे ग्रामीण या भागात खूप चांगल्या ताकदीनं लढू. पुण्यात आम्ही चांगल्या जागा लढवणार आहोत. हा मेळावा त्याची तयारी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आम्ही एकत्रितपणे लोकसभा निवडणुका लढून महाराष्ट्रात आम्हाला चांगलं यश मिळालं आणि उद्याच्या विधानसभेसाठीही आम्ही तिनही पक्ष एकत्र लढणार आहोत.
नितीन देसाई यांच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झाला आहे. यामध्ये जे संबंधीत आरोपी होते, त्यांना अटक झाली नाही. आता एनडी स्टुडिओचं नेमकं काय होणार? या प्रश्नाचं उत्तर देताना राऊत म्हणाले, हा मराठी माणसाचा मुद्दा आहेच. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसांच्या संदर्भातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलायला पाहिजे. अर्थमंत्र्यांनीही यावर बोलायला पाहिजे. कारण हा आर्थिक मुद्द्यांचाही विषय आहे, असंही संजय राऊत म्हणाले.