सध्याचे मुख्यमंत्री विसर्जित होणार हे नक्की; आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार? सामनातून सवाल
शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर हल्लाबोल करत असतात. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून भाजपा - शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, एका कार्यक्रमात अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाविषयी प्रश्न विचारला गेला ते म्हणाले २०२४ काय आत्ताच मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल हे सांगणं गैर नाही. राज्याला मुख्यमंत्री आहेत का? हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्रीपदावर रोज चर्चा झडत आहेत. मुख्यमंत्रीपद रिकामं नाही हे खरं आहे पण रिकामपणाचे उद्योग जोर धरू लागले आहेत.
मुख्यमंत्रीपदासाठी कधी विखे पाटील यांचे तर कधी अजित पवारांचे नाव चर्चेत आणले जाते आहे. या दुःखाने बेजार झालेले फडणवीस हे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशा परमोच्च अवस्थेला पोहचले आहेत.सध्याच्या राजकारणात कुणीही कोणाला डोळा मारतो हे अमृतावहिनींनी सांगितले. अहो पण हा काय संसार झाला? या सगळ्याबाबत मिंधे गटाचे गोगावले सांगतात आमच्या मनात मिंधेच.
सध्याचे मुख्यमंत्री विसर्जित होणार हे नक्की. फक्त आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार ते पाहायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका गोंधळ आणि अराजक कधीही माजले नव्हते. असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. भर मंडपात वरमाला तयार असताना अचानक बोहल्यावर मिंध्यांना चढवून फडणवीसांच्या बाबतीत जे घडवले गेले त्यातून ते अद्याप सावरलेले दिसत नाहीत. असे सामनातून म्हटले आहे.