"महाराष्ट्रात लोकांचा वणवा पेटू नये, यासाठी..."; प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
Prakash Ambedkar Press Conference: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचं आयोजन केलं. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राजकीय पक्षांकडून लवकरच यात्रा सुरु करण्यात येतील. तत्पूर्वी, सामजिक विषयाची बांधिकली जोपासण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा सुरु करण्याचं जाहीर केलं आहे. "महाराष्ट्रात लोकांचा वणवा पेटू नये, यादृष्टीने आम्ही २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात करत आहोत. उद्या चैत्यभूमीपासून सुरुवात होईल. शिवाजी मंदिराजवळ कोतलाव गार्डन आहे, तिथे २ मिनिटं स्तब्ध राहून कोलवालांचं स्मरण करू. त्यानंतर फुलेवाडा याठिकाणी थांबणार आहोत. साताऱ्याला नायगाव या ठिकाणी थांबणार आहोत. त्यानंतर कोल्हापूरला मुक्कामाला जाणार आहोत.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना, बुलढाणा आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये जाणार आहोत. औरंगाबादला ७ तारखेला दुपारी १२ वाजता जाहीर सभा आणि समारोप होईल. खूपच जोरात पाऊस पडला, तर एक दिवस वाढू शकतो, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओबीसी एका बाजूला प्रचंड घाबरलेला आहे. विशेष करून मायक्रोओबीसी घाबरलेला आहे. मागील १२ दिवसांमध्ये लहान ओबीसींमधील ९ कार्यकर्त्यांवर हल्ला झाला आहे. नाभिक समाजाची दुकाने जाळण्यात आली आहेत. लहान ओबीसींनी व्यवसाय सुरु केला आहे. त्यांच्या दुकानात जायचं नाही, त्यांच्या दुकानातून विकत घ्यायचं नाही. त्यांच्याबरोबर काहीही व्यवहार करायचा नाही. असे आदेशही निघाले आहेत. ही परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे.
या परिस्थितीतून शांततेचा मार्ग कसा निघेल, हा प्रयत्न आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केलीय, एकतर आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर आरक्षण काढून टाका. मागील लोकसभा निवडणुकीत कुणबी-मराठा समाजाचे ३१ खासदार निवडून गेले. आम्ही २२५ जागा निवडून आणू, असं शरद पवार म्हणाले होते. यामुळे परिस्थिती आणखी भयानक झाली आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.