Uddhav Thackeray Press Conference
Uddhav Thackeray Lokshahi

"मुंबईला अदानी सिटी करण्याचा मोदी आणि शहांचा डाव, पण आम्ही..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

"निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे महाबिघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पाडत आहे"
Published by :
Naresh Shende
Published on

Uddhav Thackeray Press Conference: मुंबईला अदानी सीटी करण्याचा मोदी आणि शहांचा डाव आहे. कदाचित ते उद्या मुंबईचं नावंही बदलतील. पण आम्ही असं काही कदापी होऊ देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आहे. मराठी माणूस कसा एकवटला, ते त्यांनी पाहावं. मुंबईकरांना माझं आवाहन आहे की, मुंबई रक्षक समिती स्थापन केली पाहिजे. मुंबईला लुटायचं आणि तिजोरी खाली करून मुंबईला भीकेला लावायचं कारस्थान यांच्याकडून सुरु आहे. पण ते आम्ही कदापी होऊ देणार नाही. अदानींना हे टेंडर दिलं गेलं, त्यावेळी टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी त्या देऊ करत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे महाबिघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पाडत आहे. त्यांनी आतापर्यंत केलेला कारभार जनत विसरेल आणि फसव्या योजनांना जनता बळी पडून मतदान करेल, अशी त्यांची वेडी आशा आहे. पण या योजनांमध्ये लाडक्या बहिणीसारख्या बऱ्याच काही योजना आहेत. बाकीच्या योजनांबद्दल आता मी काही बोलणार नाही. त्याबद्दल जनता बोलतेय, जनता अनुभव घेत आहे. लाडका मित्र, लाडका ठेकेदार किंवा लाडका उद्योगपती योजना याबद्दल मी बोलणार आहे. या योजनेबद्दल धारावीत आम्ही गेल्यावर्षी मोठा मोर्चा काढला होता. धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर जिथल्या तिथे मिळालच पाहिजे, ते सुद्धा ५०० स्क्वेअर फूटाचं मिळालं पाहिजे. ही शिवसेनेची आग्रही भूमिका नेहमी राहणार आहे.

धारावी नुसती झोपडपट्टी नाही, त्याच्यात वेगळेपण आहे. या प्रत्येक घरात मायक्रो स्केलचा उद्योग चालतो. बेसुमार टीडीआर काढून अदानीला द्यायचा, असा त्यांचा डाव आहे. तो आम्ही उधळून लावणार आहोत. तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही. मुंबईभर अदानींकडून टीडीआर विकत घेतला पाहिजे, ही जबरदस्तीची अट त्यांनी यामध्ये टाकली आहे. त्याविरोधात आम्ही दंड थोपटले आहेतच. फसव्या योजनांच्या माध्यमातून ते त्यांच्या ठेकेदार मित्राचं चांगभलं करत आहेत. ते आम्ही समोर आणणार आहोत.

धारावीचा प्रकल्प पाहिला तर ५९० एकरचा हा भूखंड आहे. यापैकी ३०० एकर हा गृहनिर्माणसाठी आहे. बाकिच्या ठिकाणी माहिम नेचर पार्क, टाटाचं पावर स्टेशन आहे. टेंडरमध्ये पाहिलं तर वाढीव टीडीआरचा उल्लेख नाहीय. धारवीकरांना पात्र-अपात्रतेच्या चक्रव्युहात अडकवून हाकलून द्यायचं, पण आम्ही एकाही धारावीकराला जाऊ देणार नाही. आम्ही धारावीकरांच्या मागे उभे राहू. पात्र-अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आणि अदानीच्या घशात घालायची, म्हणजे भूखंडाचा श्रीखंड करायला हे सर्व तयार असतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com