"....देवेंद्र फडणवीसांना कुणी संपवू शकत नाही, १०० पिढ्या..."; प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : मला अटक झाली तर, देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपवा, असं विधान मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. जरांगे यांच्या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मराठा समाजही देवेंद्र फडणवीसांच्या मागे उभा आहे. तुम्ही समाजाला काय दिलं आहे, हे त्यांनाही माहित आहे. काही जण देवेंद्रजींना संपवण्याची भाषा करतात. हे प्रेम कुणाच्या नशिबात आहे का? महाराष्ट्रातील जनतेचं देवेंद्रजींवर प्रेम आहे. १०० पिढ्या खाली आल्या तरी देवेंद्रजींना कुणी संपवू शकत नाही. त्यांची सहनशीलता काही लोकांना दुर्बलता वाटते. आम्ही सत्याची पाठराखण करणारे आहोत. आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत, असं म्हणत दरेकरांनी अप्रत्यक्षरित्या मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला. दरेकर मुंबईत भाजपच्या कार्यक्रमात बोलत होते.
दरेकर पुढे म्हणाले, मुंबईसाठी जो योगदान देतो, जो आपलं सर्वस्व अर्पण करतो त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा आमच्या मुंबईकरांचा संस्कार आहे. मुंबईत जो विकास झाला आहे, त्या विकासाचं केंद्रस ते फक्त देवेंद्र आहेत. हे आम्ही छातीठोकपणे सांगतो. कारण बोलण्यापेक्षा कृती करण्यावर आपला भर असतो. मुंबईच्या कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात तुम्ही काम केलं.
तसच कार्यकर्त्यांना संबोधीत करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ जिंकला तेव्हा जसा उत्साह होता, तोच उत्साह आजच्या सभेत पाहायला मिळाला. आम्ही राजकीय मंडळी आहोत, तुमचं प्रेम आणि उत्साह हेच आमचं खरं खाद्य आहे. आजचा कार्यक्रम हा उर्जा देणारा आहे. एखादं काम हातात घेतलं, तर त्याचा सातत्याने पाठपुरावा करायचा आणि ते काम करून घ्यायचं, ही प्रसाद लाडांची हातोटी आहे. युनियनचं काम हातात घेतल्यानंतर ते मला भेटायला आले.
त्यानंतर मी त्यांना सांगितलं की, हे चांगलं काम आहे. यात खूप मेहनत करावी लागते. मी स्वत: अनेक वर्ष युनियन चालवल्या आहेत. त्यामुळे याच्यात काही शॉर्टकट नसतात. तुम्हाला त्याच्यात खूप पाठपुरावा आणि मेहनत करावी लागेल. पण ती क्षमता त्यांच्याकडे असल्याने त्यांनी ते काम स्वीकारलं. एखाद्या कर्मचारी युनियनचा नेता कसा असावा, याचा वास्तूपाठ प्रसाड लाड यांनी दाखवला आहे.