Nitesh Rane: "मातोश्रीच्या माळ्यावर हॅकर्स बसवून विरोधकांचे फोन टॅप..."; नितेश राणेंचा घणाघात
Nitesh Rane Press Conference : विरोधी पक्षांचे फोन रेकॉर्ड्स काढा, लोकांना ब्लॅकमेल करा, हीच भाजपची नीती आहे, असं संजय राऊत म्हणाले होते, यावर बोलताना राणे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात विरोधकांच्या नावाने हे लोक सत्यनारायणाची पूजा घालायचे का? प्रत्येक विरोधकांच्या मागे खोट्या केसेस टाकणे, मातोश्रीच्या माळ्यावर हॅकर्स बसवून विरोधांचे फोन टॅप करायचे, याची माहिती आम्ही राज्याला द्यायची का? विरोधकांचे फोन टॅप करण्यासाठी मातोश्रीवरून हॅकर्सला पैसे द्यायचे, याची पण माहिती द्यायची का? हे आधी बघा आणि मग दुसऱ्यांवर आरोप करा, असं म्हणत भाजप नेते नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत असं म्हणतात की, पुराशी सामना करायला बिहारला १८ हजार कोटी, पण महाराष्ट्राचा पूर दिसत नाही का? किमान १ हजार कोटी तरी द्यायचे होते, यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते नितेश राणे म्हणाले, शाळेतील ढ विद्यार्थ्याला अर्थसंकल्प समजावायला सांगितलं, तर मग अशा पद्धतीचे विधाने येतात. महाराष्ट्राला अर्थसंकल्पात नेमकं काय मिळालं आहे? हे ज्याला कळत नाही, समजून घ्यायचं नाही, ते त्या पद्धतीचं विधान करत असतात.
महाराष्ट्राला काय मिळालं आहे, त्याबद्दल माहिती द्यायची असेल, तर देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद सामनाच्या कोपऱ्यात जाऊन मोबाईलवर तरी बघ. तर तुला कळेल, अर्थसंकल्पात महाराष्ट्राला किती भरभरून मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीनं महाराष्ट्राच अध:पतन केलं. महाराष्ट्राला नॉन बायोलॉजिकल गृहमंत्री मिळाले आहेत, असं संजय राऊत म्हणाले, यावर उत्तर देताना राणे म्हणाले, २०१९ नंतर उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली.
महाराष्ट्राच्या जनतेच्या कौलाच्या विरोधात गेले, तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची अधोगती व्हायला सुरुवात झाली आहे. बायोलॉजीकल आणि नॉन बायोलॉजीकलची यादी काढायची असेल, तर मग संजय राऊतची बायोलॉजीकल आणि नॉन बायोलॉजीकलची अशी यादी प्रकाशित करू की घरातलेही तुम्हाला चपला मारून बाहेर फेकून देतील. या गोष्टीची काळजी घे. बायोलॉजीकल आणि नॉन बायोलॉजीकल बोलण्याची हिंम्मत संजय राजाराम राऊतने करु नये, असंही नितेश राणे म्हणाले.