अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी, पत्रकार परिषदेत म्हणाल्या, "लक्ष्मीच्या हाती कमळ..."
अमरावती लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केलीय. स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध असतानाही नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यानं अमरावती मतदारसंघात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा तीव्र विरोध असतानाही नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिलीय. त्यामुळे आगामी काळात बच्चू कडू कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. राणा यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत प्रतिक्रिया दिलीय. उमेदवारी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे आभार मानते. तसंच ज्या जनतेनं मला इथपर्यंत आणलंय, त्यांचेही मी आभार मानते, असं नवनीत राणा म्हणाल्या.
नवनीत राणा माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाल्या, "लक्ष्मीच्या हातात नेहमी कमळ असतंच. गेल्या १२-१३ वर्षांपासून अमरावतीकरांची सून म्हणून मी काम करत होती. अमरावतीकरांची इच्छा पूर्ण झाली. या देशाचे प्रधानमंत्री यांना मी माझा नेता मानते. अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि देशाचे भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनाही मी माझे नेते मानते. त्यांनी घेतलेल्या निर्णायापुढे मी जाणार नाही.
आज मला दिल्लीवरून फोन आला. त्यांच्या शब्दापुढे मी जाणार नाही. मी अमरावतीकरांच्या वतीनं या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी अमरावतीकरांच आवाज ऐकलं. माझ्या कामाची पोचपावती मला दिली. आम्ही आधीपासूनच एनडीएमध्ये होतो आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला. मेहनत करणाऱ्यांच्या पाठिशी असे नेते उभे राहतात"