Nana Patole
Nana Patole

Nana Patole : "...तर उद्या अटल सेतू वाहून जाईल"; नाना पटोले यांनी सरकारला दिला इशारा

"राज्यातील सरकार फक्त टेंडर काढण्यासाठी काम करत आहे. टेंडर काढून कामाच्या माध्यमातून पैसे खाण्याचा कारभार सुरु आहे"
Published by :
Naresh Shende
Published on

Nana Patole Press Conference : राज्यातील सरकार फक्त टेंडर काढण्यासाठी काम करत आहे. टेंडर काढून कामाच्या माध्यमातून पैसे खाण्याचा कारभार सुरु आहे. भ्रष्टाचाराच्या सीमा या सरकारने ओलांडल्या आहेत. अटल सेतूच्या पुलाल भेगा पडल्या आहेत, हे काल आम्ही समोर आणलं. त्यानंतर ते म्हणतात की, रस्त्याला भेगा पडल्या आहेत. पाऊस पडलेला नाही. पाऊस पडला असता, तर रस्ताच वाहून गेला असता, अशी परिस्थिती आहे. आज रस्ता वाहत गेला तर उद्या अटल सेतू वाहून जाईल. भ्रष्टाचार ही या सरकारची भूमिका आहे, म्हणून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या लोकांना महाराष्ट्रात पेशवाई आणायची असेल, तर आम्ही या लोकांना महाराष्ट्रात पेशवाई आणू देणार नाही, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

काळाराम मंदिरातील घटना खूप निषेधार्ह आहे. अशा पद्धतीच्या घटना सरकारच्या आशीर्वादाने होत असतील, तर सरकारने हे तातडीनं थांबवलं पाहिजे. ज्या व्यक्तीनं हे पाप केलं असेल, त्या कायमचं जेलमध्ये टाकलं पाहिजे. या घटनेची चीड महाराष्ट्रात पसरली आहे. सरकारने या गोष्टीकडे लक्ष घालावं, ही भूमिका काँग्रेसची आहे. हा शाहू-फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात भाजपने ज्या पद्धतीने व्यूहरचना केली आहे, ते कदापी चालणार नाही.

हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा शाहू-फुले आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात या पद्धतीचं जे वातावरण पसरवण्याचं काम सरकारमध्ये बसलेले लोक करत असतील, तर याची गंभीर दखल काँग्रेस पक्ष घेईल. विधानसभेपर्यंत जी लढाई आम्हाला लढावी लागेल, ती आम्ही लढू. शाहू-फुले आंबेडकरांच्या विचाराला कुठेही काळीमा लागणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत.

महाराष्ट्रात ३५० हून अधिक ओबीसींच्या जाती आहेत. भारतीय जनता पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सांगतात की, ५० टक्केच्यावर आरक्षण देता येत नाही. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की, आम्हाला ५० च्यावरही जाता येतं, असं सांगतात. नेमकी भूमिका काय आहे, ही स्पष्ट केली पाहिजे. पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय नितेश कुमार यांच्याविरोधात आलेला आहे, तो खऱ्या अर्थाने दिशादर्शक आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत फार तफावत दिसत आहे. याचा अर्थ भाजप महाराष्ट्राच्या ओबीसी, मराठा आणि आरक्षणाच्या यादीत असलेल्या जातींना फसवत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जातीनिहाय जणगणना हाच या देशातील मूळ प्रश्न राहीलेला आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com