Nana Patole: नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, "राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज..."
Nana Patole Press Conference: मी प्रामुख्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमचा उल्लेख करतो, कारण सर्व जण ईडी आणि सीबीआयच्या धाकानं भाजपच्या गळाला लागले आहेत. अनिल देशमुख ज्या पद्धतीनं आरोप करत आहेत, तोच प्रयोग अनिल देशमुखांवर केला गेला असेल. त्या सर्व गोष्टींचा खुलासा ते करत आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्याकडे ऑडिओ आणि व्हिडीओही आहे. तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहेत ना, मग तुम्हाला कुणी थांबवलं आहे? तुम्ही संविधानाची शपथ घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री झाले आहात, जे असेल तरे करा. तुम्ही वस्तुस्थिती मांडली पाहिजे. राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणून नवीन पिढीला बर्बाद केलं आहे, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
नाना पटोले पुढे म्हणाले, ड्रग माफियाला तुम्ही ससून रुग्णालयात फाईव्ह स्टार व्यवस्था देता. जेलमध्ये फाईव्ह स्टार सुविधा देता. अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रात असेल, तर मग या पदाचा उपयोग विरोधकांना धमकावण्यासाठी करता का? हा प्रश्न आता जनतेत निर्माण झाला आहे, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे वित्तमंत्री सांगतात की मी पैसे आणू कुठून? पैशांसाठी राज्याच्या सर्व शासकीय जमिनी विकायला लागतील, अशा पद्धतीची भूमिका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार घेतात.
या लोकांनी राज्य गहाण टाकलं आहे, असा आम्ही आरोप करत होतो. पण अजित पवारांच्या विधानांमुळे ही वस्तुस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राला १० लाख कोटींच्या कर्जात डुबवलं. विकासाच्या नावाने पैसे घेतले. यांचा स्वत:चा विकास झाला. लाखो, कोटी रुपये खर्च करून समृद्धी महामार्गावर भेगा पडत असतील, त्यात लोकांचा रोज जीव जात असेल, काही लोक अपंग झाले आहेत. जनतेची समृद्धी झाली, असं सांगणारी ही लोकं आहेत, पण लोकांचा जीव घेण्यासाठी हे मार्ग बनवले आहेत का? हे सांगत होते, २० वर्ष या रस्त्याला काही होणार नाहीत.
पण आता या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. वर्ष-दोन वर्षात त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचं प्रमाण किती मोठं असेल, याचा अंदाज घ्यावा लागेल. विधानसभेतही आम्ही भूमिका मांडली. पण तीन तोंडाचं सरकार जे महाराष्ट्रात आहे, कोण जास्त पैसे खातो? कोण राज्याची तिजोरी जास्त लुटतोय? अशाप्रकारची स्पर्धा या सरकारमध्ये लागली आहे, असंही नाना पटोले म्हणाले.