Raj Thackeray: राज ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा; म्हणाले, "बाहेरची मुलं या राज्यात..."
Raj Thackeray Press Conference : मागील दोन-तीन वर्षांपासून केंद्र सरकार राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणूका घेत नाहीत. तिथे नगरसेवक नाहीत. नगसेवक नसल्यामुळं जबाबदारी घेणार कोण? प्रशासनाशी बोलायचं कुणी? या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रशासनाची आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांना फुकटंची घरं दिली जात आहेत. या राज्यात राहणारी लोकं भीख मागत आहेत. याला काय सरकार चालवणं म्हणतात का? बाहेरची मुलं या राज्यात आल्यावर ती या राज्याची होतात आणि इकडची मुलं कोट्यातून मागणी करत आहेत. प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय, महाराष्ट्राचा कुणी विचार करणार आहे की नाही? मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून बाहेरची लोकं फुकट घरं घेत आहेत. पण स्वत:च्या कष्टाचे पैसू देऊन जी लोकं घर घेत आहेत, ते वाऱ्यावर पडले आहेत. जे या राज्याचे मालक आहेत, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले, मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे. मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला. कारण प्रत्येक वेळी राज्य सरकारकडून डेव्हलोपमेंट प्लॅन येतो. टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नसते. किती गाड्या येतात? किती स्कूटर्स येतात? त्या पार्क कुठे होणार? लोकं राहणार कुठे? टाऊन प्लॅनिंगला काही हजार लोकांसाठी सुविधा असाव्या लागतात. त्याठिकाणी रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, बागा असाव्या लागतात.
या सर्व गोष्टी या टाऊन प्लॅनिंगमध्ये असतात. अशी कोणतीही गोष्ट आपल्या शहरांमध्ये राबवली जात नाही. जमीन दिसली का विकायची, एव्हढा एकच उद्योग सुरु आहे. पुणे एक शहर राहिलं नाही. पुण्यात पाच पाच शहरं झाली आहेत. मुंबईत जेव्हा लोखंडवाला कॉम्प्लेक्स झालं, त्यावेळी आम्हाला वाटलं की, वेगळी मुंबई झालीय. पुण्यात जितक्या कमी काळात या सर्व गोष्टी घडल्या आहेत, हे सर्व विचित्र आहे.
पुण्यासाठी स्वतंत्र महानगरपालिका करून प्रशासनाचं काम हलकं होणार आहे का? यावर प्रतिक्रिया देतना राज ठाकरे म्हणाले, एखाद्या शहरात खूप एजन्सी काम करत असतात. सरकारच्या या संस्थांची एकत्रित बैठक होत नाही. टेंडर निघाल्यावर पैसे काढता येतात, हे यामागचं कारण आहे. सरकारला चांगले रस्ते, फुटपाथ बनवायचे नाहीत. या शहरातील नगरसेवकांनी आता जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.