"दरडग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
Eknath Shinde Press Conference : दरडग्रस्त लोकांची जीवितहानी आणि मालमत्तेची हानी होऊ शकते. त्यामुळे आजच मी एमएमआरडीएसोबत चर्चा केली आहे. धोकादायक ठिकाणी दरडी कोसळू शकतात. तिथे राहणाऱ्या लोकांना तातडीनं स्थलांतरीत करायचं आणि एमएमआरडीएच्या घरामध्ये पर्यायी व्यवस्था करायची. ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे, तिथे सेफ्टी नेट लावून टाकायचं. त्यामुळे ही सर्व धोकायदायक ठिकाणे सुरक्षीत राहतील. त्या ठिकाणी दगड, गोटे कोसळणार नाहीत. लोक म्हणतात, आम्हाला नोटिसा देऊन घर खाली करायला सांगतात, मग आम्ही जायचं कुठं? त्यामुळे त्यांचीदेखील आम्ही व्यवस्था केली आहे. एमएमआरडीएच्या घरांमध्ये त्यांना आम्ही निवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही.
शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, लोकांनीही सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. जीवापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही. लोकांना शाळेत किंवा शेडमध्ये आम्ही ठेवणार नाही. त्यांना पक्क्या घरात निवारा दिला जाईल. नाला रुंदीकरण, रस्ता रुंदीकरण, ज्या ठिकाणी नाल्याचा भाग अरुंद झाला आहे, त्या ठिकाणी पाणी तुंबून लोकांच्या घरात जाऊ शकतं. तिथे जे अतिक्रमण आहेत, त्या अतिक्रमणधारकांनीही सहकार्य करावं. त्यांना नुकसानभरपाई किंवा पर्यायी व्यवस्था दिली जाईल.
नाले अरुंद झाले तर त्या भागातील लोकांना त्रास होईल. महापालिकेला सहकार्य केलं पाहिजे. नालेसफाई जर व्यवस्थित झाली, तर मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याचं प्रमाण कमी होईल. हार्ड बेस लागेपर्यंत नाल्यातील गाळ काढण्याची आवश्यकता आहे. आताही नालेसफाई करताना हार्ड बेस लागलेला दिसला. मशिनच्या माध्यमातून जलपर्णीही काढली जात आहे. जोरात पाऊस पडल्यास रेल्वेसोबत डिप क्लीन ड्राईव्ह घेण्याचा विचार आहे, असंही शिंदे म्हणाले.