'...जे उद्धव ठाकरेंचे झाले नाही, ते श्रीरामाचे काय होणार?', खैरेंची शिंदे गटावर बोचरी टीका
राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना, त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे राज्याच्या राजकारणात या दौऱ्यावरून प्रचंड चर्चा सुरु आहे. विरोधक देखील या मोर्चावरून मुख्यमंत्री शिंदेंवर तोंडसुख घेताना दिसत आहे. आरोप- प्रत्यारोपाची सत्र सुरु असताना आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.
नेमकं काय केली चंद्रकांत खैरे यांनी टीका?
शिवसेना शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्यावर बोलताना खैरे म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर अयोध्येला गेलेले मंत्री, आमदार, खासदार हे नाटकी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे नाटक सुरू आहे. जणू काही हेच खरे रामभक्त आणि दुसरे खोटे. मुख्यमंत्री शिंदे यांचे वागणे म्हणजे मुंह मे राम, बगल मे छुरी, असल्याचा टोला खैरेंनी लगावला.
पण आज जे तिथे गेलेत ते फक्त शोबाजी करण्यासाठी गेले आहेत. उद्धव ठाकरे याच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर आलेल्यांना खरी रामभक्ती काय कळणार? उद्धव ठाकरे यांनी पहिले राम मंदिर फिर सरकार, असा नारा दिला होता. त्यामुळे आपणच खरे राम भक्त आहोत, बाकीचे नाहीत हे दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न दिसतो. असे खैरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, अयोध्येत जावून देखील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका करतात. अयोध्येत रामाचे दर्शन घ्यायला गेलात का आमच्यावर टीका करायला? असा सवाल देखील खैरे यांनी उपस्थितीत केला. श्रीराम हे एकवचनी होते, पण शिंदे अनेकवचनी आहेत. जे उद्धव ठाकरेंचे झाले नाही, ते श्रीरामाचे काय होणार? असा सवाल करत त्यांनी मुखमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली.