तांत्रिक बाबी उपस्थित करत सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न; तटकरेंचा शरद पवार गटावर आरोप
मुंबई : राष्ट्रवादी कुणाची यावर आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार युक्तिवाद केले. आज अजित पवार गटावर बोगस शपथपत्रांचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. तर, पुढील सुनावणी आता 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत शरद पवार गटावर सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
सुनील तटकरे म्हणाले की, खरंतर आज मेरीटवर युक्तीवाद होण्याची आवश्यकता होती. परंतु, तांत्रिक पध्दतीच्या बाबी उपस्थित करत सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप त्यांनी केला आहे. आज अडीच लाखापेक्षा जास्त शपथपत्र आमच्याकडून दाखल झाली होती. तेव्हा पळवाटा शोधण्यासाठी अतिशय अल्प अशा शपथपत्रावर काही त्रुटी आहेत अशा पध्दतीने सांगण्याचा प्रयत्न केला गेला, असेही त्यांनी म्हंटले आहे.
सलग सुनावणी व्हावी अशी आमची मागणी होती. त्यानुसार २० नोव्हेंबरपासून सलग सुनावणी होणार आहे. तांत्रिक त्रुटी आहेत त्या न्यायालयासमोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शरद पवार गटाने निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटावर आरोप केला आहे. अजित पवार गटाच्या 20 हजार शपथपत्रांचीच तपासणी केली तर 8900 शपथपत्र बोगस सापडले आहेत. काही शपथपत्रे मृतांच्या नावे, काही अल्पवयीन मुलांच्या नावे, काही अस्तित्वात नसलेली पदे तर काही ठिकाणी झोमॅटो सेल्स मॅनेजर म्हणून लिहिले आहे, असा दावा शरद पवार गटाने केला आहे.