...म्हणून आम्हालाच अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळेल; शंभुराज देसाईंचा दावा
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटाकडून शिवसेना आपलीच असा दावा करण्यात आला. यावरच आता शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याबाबतची केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. मात्र, आता दोन्ही गटाच्या नेत्यांत जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले शंभूराज देसाई?
जेव्हा जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली तेव्हा आम्ही ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाची भूमिका अधिकृतपणे कागदपत्रांसह लेखी स्वरुपात मांडली. आमदारांमधील बहुमत आमच्याकडे आहे. खासदारांमधील बहुमतही आमच्याकडेच आहे. नगरसेवक आणि पक्षाच्या जिल्हा प्रमुखांमधील बहुमत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडे आहे. अशी माहिती देसाई यांनी यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, सर्व लोकप्रतिनिधींमधील बहुमत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आम्ही दाखल केलेल्या सगळ्या बाबींचा केंद्रीय निवडणूक आयोग विचार करेल. म्हणून आम्हालाच अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळेल आणि पक्षचिन्हही मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. असे शंभुराजे देसाईंनी यावेळी सांगितले.