शरद पवारांची मानसिकता तिकडे राहण्याची दिसत नाही; 'त्या' कृतीवरुन महाजनांची खोचक प्रतिक्रिया
मुंबई : इंडिया आघाडीची महत्वाची बैठक मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीची माहिती देण्याकरता महाविकास आघाडीकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी भूमिका मांडली. परंतु, शरद पवारांनी भाषण आटोपत घेतल्याने सर्वांच्याच भुवया आता उंचावल्या आहेत. याच मुद्द्यावरुन भाजप नेते गिरीश महाजन यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांची मानसिकता तिकडे राहण्याची दिसत नाही, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
निती आयोगाच्या आडून मुंबई वेगळी करणं किंवा मुंबई केंद्रशासित करणं डाव आता उघड झाला आहे. मात्र हा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असे उध्दव ठाकरे म्हणाले होते. यावरही गिरीश महाजनांनी शरसंधान साधले आहे. उद्धव ठाकरे यांची अवस्था काय झाली हे कळत नाही. भारत मातेला बेड्या घालत आहे हे बोलत आहेत. कुठली हुकूमशाही आहे. तुमच्यासोबत आज कोण राहिले? आज तुमचे आमदार तुमच्यासोबत राहीले नाही. हुकूमशाही कुणाला म्हणतात नारायण राणे यांना जेवणावरून उठवले, मला मोक्का लावलाय, अशी टीका त्यांनी केली आहे.
देशाचे नेतृत्व एक मान्य आहे. संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात चले जावचा नारा मुंबईत सुरू झाला. इतका कच्चा तुमचा इतिहास आहे. तुम्हाला निवडणुकीची घाई का झाली? संजय राऊत यांना तुम्ही उभे करा. उद्धव ठाकरेंनी एक जागा तरी निवडून आणून दाखवावी. तुमच्या गटाचा एक खासदार निवडून आणून दाखवा, असे आव्हानच महाजनांनी उध्दव ठाकरेंना दिले आहे.